✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.13 ऑगस्ट) :- दरवर्षीची नापिकी आणि वाढत जाणारे कर्ज हे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर नेहमीच बसलेले असतात. त्यातच यावर्षी पाऊस उशिरा आल्याने पेरणील झालेला उशीर आणि मागील विस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील नवेगांव मोरे येथील एका शेतकऱ्याने शनिवारी (दि.१२) रोजी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली. मनोज भिवा ढवस (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नांव आहे. मनोज ढवस याचे घराजवळच शेत असून तो शेतात फवारणीचे काम करीत होता. फवारणी करतांना त्याच्या मनात काय आले कुणास ठाउक त्यांनी दुपारी चार वाजताच्या सुमारास(कीटकनाशक) फवारणीचे औषध प्याले.
त्याला तातडीने नवेगांव मोरे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. किरकोळ उपचार करून त्याला पोंभूर्णा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रूग्णालयातील डाॅक्टरांनी त्याला चंद्रपुर सामान्य रूग्णालयात रेफर केले. सामान्य रूग्णालयात उपचार सुरू असतांना रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान मनोज ढवस चा मृत्यु झाला.
शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नवेगांव मोरे येथे त्यांच्या गावी आणण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसले तरी त्याच्यावर दिड लाखाहून अधिकचे बँकेचे कर्ज असल्याचे सांगितले जात आहे. मनोजच्या मृत्यु पश्चात पत्नी सिमा, मोठी मुलगी सलोनी (१६) व लहान मुलगी शिवानी (१३) असा परीवार आहे. त्याला शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
![](https://vidarbhapratishtha.in/wp-content/uploads/2023/01/IMG-20230113-WA00011.jpg)