विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय नेत्यांच्या घोषणांची व्हावी अंमलबजावणी The declarations of the political leaders shuld be implemented for the overall development of vidarbha

✒️रवींद्र तिराणिक नागपूर(Nagpur स्पेशल रिपोर्टर ) 

नागपूर(दि.6 मार्च) :-“जनमंचच्या -जनसंवाद” या उपक्रमात ‘विदर्भ अफाट क्षमतेचा भकास प्रदेश” या विषयावर रविवारी मोरभवन येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रमुख वक्ते वेद चे माजी अध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी विदर्भाचे मागासले पणाबद्दल लक्ष वेधून विदर्भात साधन समृद्धी संपत्ती मोठ्या प्रमाणात असून देखील एवढे हाल का झाले व होत आहे यावर सविस्तर प्रकाश टाकला. विदर्भाच्या भरोशावर पश्चिम महाराष्ट्र प्रगती गाठू शकला यावर त्यांनी भाष्य केले.

 विज ,कोळसा, आणि विविध खनिजे ,मुबलक मोठ्या प्रमाणात पाणी ही आपली बलस्थाने आहेत. पण या बलस्थानचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून समृद्धी खेचून आणण्यास आपण अपयशी ठरलो आहोत. राजकीय इच्छाशक्ती नसल्याने विदर्भ भकास राहिला आहे. असे प्रतिपादन नैसर्गिक संसाधनाचे अभ्यासक, वेद चे माजी अध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी रविवारी केले.

जनमंच तर्फे जनसंवाद कार्यक्रमात “विदर्भ अफाट क्षमतेचा भकास प्रदेश” या विषयावर आयोजित विशेष व्याख्यान सिताबर्डी येथील हिंदी साहित्य संमेलनाच्या अर्पण सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जनमंच विशेष मार्गदर्शक सल्लागार प्रा. शरद पाटील, जनमंच अध्यक्ष राजीव जगताप, महासचिव विठ्ठलराव जावळकर, उपाध्यक्ष दादा झोडे, अॅड. मनोहर रडके, उपस्थित होते.

यावेळी प्रदीप माहेश्वरी म्हणाले कुठल्याही प्रदेशाच्या विकासात तेथील राजकारण्यांची भूमिका महत्वाची असते. आज आपल्याकडील दिग्गज नेत्यामुळे भारताला ओळखले जाते. परंतु याचा परिणाम विकासाच्या रूपाने दिसून येत नाही. विदर्भातून वीज पुण्यात जाते. तिथून ट्रकची निर्मिती होते. सॉफ्टवेअर कंपन्या मोठ्या होतात. हे आपल्याकडेही होऊ शकते.

विजेचे उत्पादन विदर्भात होऊनही येथील उद्योगधंदे छत्तीसगड ला जात आहेत. केवळ मुंबई, पुणे, आणि नाशिक येथील विकास करण्यासाठी विदर्भाचे शोषण करण्यात येत आहे. आपले नेते मोठ्या घोषणा करतात. त्यांच्या बातम्या प्रकाशित होतात. दुर्दैवाने पुढे त्या घोषणांचे पुढे काहीच होत नाही. आपणही वैदर्भीय लोक त्याचा पाठपुरावा करीत नाही. ही स्थिती कुठेतरी बदलायला हवी.

————————————– –

तरच शैक्षणिक संस्थांचा उपयोग नागपुरात व्हीएनआयटी, एलआयटी, आयआयएम, ट्रिपल आयटी , यासारख्या शैक्षणिक संस्था आहेत. पण, तेथील विद्यार्थ्यांना विदर्भात नोकरी मिळत नाही. “ज्या दिवशी येथील विद्यार्थ्यांना नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही. त्यादिवशी या शैक्षणिक संस्थांचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल.” असे प्रदीप माहेश्वरी म्हणाले.

—————————————

विदर्भ राज्यांच्या मागणीसाठी अनेक लोक वेगवेगळे विचार व्यक्त करतात, बहुतांश अनेक विचार अपुऱ्या माहितीच्या आधारावर व अर्धसत्य असतात त्यात खरं काय, हा एक सवालच आहे. विदर्भाच्या दूरदशेसाठी राजकीय अनास्था जबाबदार आहे का, सशक्त विदर्भ संपूर्ण देशाला समृद्धी देऊ शकेल का, पंतप्रधानाच्या गतिशक्ती योजनेला गती देण्यासाठी विदर्भात एवढी क्षमता आहे का, आदीसह अनेक प्रश्नांची उत्तरे प्रदीप माहेश्वरी यांनी याप्रसंगी दिली . विदर्भात कोळसा आणि सिमेंटचे उत्पादन वाढल्याचे आपण अनेकदा ऐकतो. हे सर्व विकासाचे घोतक आहे.

पण याकडे राजकीय नेत्यांचे दुर्लक्षच असते. समृद्धी महामार्गामुळे नवे उद्योग येतील असे म्हटले जात होते. पण चार महिन्यानंतर असे काहीच घडले नाही. बुट्टीबोरी असो वा मिहान या मोठ्या औद्योगिक परिसरात उल्लेख करता येतील, असे मोठे उद्योग आले नाहीत. आकडेवारी सादर करताना विदर्भाच्या विकासासाठी राजकीय दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा विचार मांडला.

जनमंच -जनसंवाद कार्यक्रमात प्रा शरद पाटील यांनी आपले अध्यक्षीय मनोगत मांडले, प्रास्ताविक जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी तर सूत्रसंचालन संध्या देवरे यांनी केले. आभार विठ्ठलराव जावळकर यांनी मानले कार्यक्रमाला शेतकरी नेते विजय जावंधिया, नितीन रोंधे, अभिजीत केळकर, संपादक प्रकाश पोहरे, रवींद्र तिराणिक यांची उपस्थिती होती.