रिसोर्टसाठी शेतजमिनीतून जबरदस्तीने मार्ग; पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांचा आक्रोश

✒️गुणवंत चटपकार चिमूर (Chimur तालुका प्रतिनिधी)

चिमूर(दि.27 फेब्रुवारी) :-

         बामणी शेतशिवारात रिसोर्ट प्रकल्पासाठी उभ्या पिकातून १५ फूट रुंदीचा रस्ता काढण्यात आल्याने स्थानिक शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. विधवा महिला शेतकरी नमिता येळणे यांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली असून कापूस पिकासह २२ सागवान झाडांचे नुकसान झाल्याचा आरोप केला आहे.

        माहितीनुसार, सर्वे क्र. २३७ मधील १.१८ हेक्टर आर जमीन प्रविण सपाटे यांनी रिसोर्ट उभारणीसाठी खरेदी केली. संबंधित विक्रीपत्रात आधीपासून वहिवाट रस्ता नमूद असतानाही नवीन मार्गाची मागणी करण्यात आली. त्यासाठी चंदन येळणे व किसन दुधनकर यांच्या शेतातून रस्ता देण्याचा प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर करण्यात आला. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अंतर्गत अर्जावर सुनावणी झाली. यावेळी येळणे व दुधनकर यांनी लेखी आक्षेप घेत, जुन्या रस्त्याचा वापर करावा किंवा वन विभागाच्या जागेतून पर्यायी मार्ग शोधावा, अशी भूमिका मांडली. तसेच शेतातून रस्ता देण्यास विरोध दर्शवित कायदेशीर कारवाईची मागणी केली.

          तरीदेखील २३ जून २०२५ रोजी तहसीलदारांनी संबंधित शेतधुऱ्यावरून १५ फूट रस्ता मंजूर केला. या आदेशाविरोधात अपील न केल्याने पुढील कारवाई थांबविता आली नाही, असे येळणे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिस व महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. उभ्या कापूस पिकातून मार्ग काढताना मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेत भाड्याने करणाऱ्या व्यक्तीस भरपाई देण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी मूळ जमीनमालकांना कोणतीही नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे नमिता येळणे यांनी स्पष्ट केले.

         ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरात पर्यटनवाढीमुळे रिसोर्ट उभारणीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, यासाठी शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येऊ नये, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

आमच्या मालकीच्या शेतातील उभे पीक आणि सागवान झाडे उद्ध्वस्त झाली. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून आम्हाला योग्य न्याय द्यावा.”…नमिता येळणे, विधवा महिला शेतकरी