शेगाव (बु) ग्रामपंचायतीत भ्रष्टाचारच भस्मासूर ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप

🔸पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी मांडले पुरावे — कचरा कुंडी, नाली बांधकाम, पाणीपुरवठा व दिव्यांग निधी वितरणात अनियमिततेचा आरोप

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.14 जानेवारी) :- वरोरा तालुक्यातील शेगाव (बु)ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत करत ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ग्रामविकासाऐवजी भ्रष्टाचाराचा भस्मासूर ग्रामपंचायतीत सक्रिय झाला आहे,असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीत ५ लाख २६ हजार ३३८ रुपयांच्या कचरा कुंड्या खरेदी करण्यात आल्या असून, आजतागायत एकाही लाभार्थ्याला त्यांचे वितरण करण्यात आलेले नाही. बाजारभावापेक्षा जास्त दराने या कुंड्यांची खरेदी झाल्याचाही गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

तसेच, संजय दातारकर यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम अपूर्ण असूनही त्या कामाचे पूर्ण बिल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले. पाणीपुरवठा योजनेसाठी शुभमर्शीबल मोटारींची खरेदी दाखविण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात त्या तिन्ही मोटारी बसविण्यात आल्या नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांनी पुढे सांगितले की, दिव्यांग निधी वितरणातही गंभीर अनियमितता झाली असून, काही ग्रामपंचायत सदस्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून निधी वाटप करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, ब्लॅक लिस्टेड कंत्राटदार असूनही रतन लोंडे यांच्या नावाने कामे देऊन त्यांचे बिल काढण्यात आल्याचेही निदर्शनास आणून दिले.

याशिवाय, नव्याने मंजूर होणाऱ्या दारू दुकानासाठी ना हरकत प्रमाणपत्र देताना काही सदस्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले आहे.

या पत्रकार परिषदेत ग्रामपंचायत सदस्य प्रफुल वाढई, माया कैलास तडस, अक्षय बोन्दगुलवार, अमोल दातारकर, राकेश इखार, नवीश नरड, तंटामुक्तीl अध्यक्ष गजानन ठाकरे, गीता फुलकर, वायसीसी ग्रुप शेगावचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामपंचायतीची मासिक सभा झालेली नाही. एकही ग्रामसभा न घेता सर्व सभा तहकुब केल्या जात आहेत, त्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले असून ग्रामविकासावर थेट परिणाम होत आहे.

ग्रामस्थांनी प्रशासनाने या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली आहे.