बंदी भागातील आदिवासींच्या दळणवळणासाठी असलेल्या पुलाची पूर्णतः चाळणी झाली. या ठिकाणी जीव गेल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग जागे होणार का

🔹थेरडी – बोरी (वन) येथील नागरिकांचा प्रशासनाला सवाल

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी) 

महागाव(दि.13 ऑगस्ट) :- देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पुर्ण होऊन शासन प्रशासनाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला.परंतु उमरखेड तालुक्याच्या बंदी भागातील आदिवासी बहुल असणारी गावे आजही दळणवळणाच्या मूलभूत सुविधांपासून कोसो दुर आहेत.

थेरडी, बोरी(वन),गाडी ह्या गावातील नागरिकांना उखडलेल्या आणि प्रचंड जीर्ण झालेल्या पुलावरून वाहतूक करणे म्हणजे मरणाच्या दारातून जाने आहे. उमरखेड सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र गेंड्याची कातडी ओढुन असल्यागत सुस्त भूमिकेत दिसत आहे,अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली.

  सदर पूल हा बोरी वन आणि थेरडी या गावांच्या दरम्यान आहे. त्याची अवस्था ही 99% जीर्ण झालेली आहे.पाऊस पडल्यानंतर पुरामुळे नुकतीच एक डिलिव्हरी पेशंट नेणारी ॲम्ब्युलन्स ऐन पुलावर पूर परिस्थितीत अडकलेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या ठिकाणी रस्त्यावरून महिला,वृद्ध,तालुक्याला शाळा आणि कॉलेजला जाणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी ये जा करीत असतात.सदर कामाची मंजुरी मिळालेली असतांना सुद्धा बांधकाम विभागाची दिरंगाई म्हणजे जीव गेल्यावर जागे होणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सदर रस्त्यावरील पुलाचे मंजूर बांधकामास तत्काळ सुरुवात न केल्यास भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रिय आदिवासी एकता परिषदेचा नेतृत्वात संपूर्ण गावे एकत्र येऊन येणाऱ्या स्वातंत्र्यदिनी उपोषण तथा आंदोलन करू असा इशाराही या वेळी गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

या वेळी भारत मुक्ती मोर्चाचे विद्वान केवटे, राष्ट्रिय आदिवासी एकता परिषदेचे प्रल्हाद मेंढके,मारुती लांडगे,स्थानिक जयदीप नखाते,सुरज मेंडके,सुरेश चिरंगे,सुमित काळे, मंगेश काळे,मंगेश चिरंगे,दिलीप पाटील, माणिक भगत, विवेक कुरकुटे,केशव पेडेवाड, सूरज पाटील यांचेसह गाडी बोरी, थेरडी गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.