लोकसभेत विकासाभिमुख नेतृत्वाला विजयी करा…किशोर टोंगे

🔸सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेसाठी पाठिंबा

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.29 मार्च) :- देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजले असून लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील सहा जागांवर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. आज चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-रिपाई महायुतीचे उमेदवार म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अर्ज भरला आहे.

यावेळी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात विधानसभेसाठी तयारी करत असलेले युवा नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले किशोर टोंगे यांनी सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा दिला असून यावेळी झालेल्या रॅली मध्ये व अर्ज भरताना ते जिल्ह्यातील नेत्यांसोबत उपस्थित होते.

यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांची विकासाभिमुख असलेली भूमिका, त्यांची कार्यक्षमता आणि त्यांचं विकासासाठी असलेल व्हिजन पाहून त्यांना पाठिंबा देत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

गेल्या दहा वर्षात देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात विकास होत असून विदर्भात देखील देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात पायाभूत सुविधा,सिंचन आणि कृषी यासह अनेक कल्याणकारी कामे झाली आहे.

त्यांच्या एकूण कामाचा आवाक्याचा आणि नेतृत्वाचा विचार करता सुधीर मुनगंटीवार याच्यासारखे नेते लोकसभेत गेल्यास मतदार संघाला व पर्यायाने आपल्या नागरिकांना विकासाचे अनेक चांगले प्रकल्प मिळू शकतात. इतक्या वर्षात विदर्भ हा रस्ते मार्गाने कधीच जोडल्या गेला नव्हता तो देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या पाच वर्षात समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबई आणि पुण्यासोबत जोडण्याचं अशक्य काम त्यांनी करून दाखवल आहे.

इतकंच नव्हे तर या पायाभूत प्रकल्पाचा फायदा आपल्या जिल्ह्यातील विकासासाठी करून घेण्याची वेळ आली असून यामुळे आपल्या क्षेत्रात प्रदूषण मुक्त उद्योग व्यवसाय आणण्याची संधी असून सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा नेता त्यासाठी आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

जिल्ह्यात वरोरा-वणी महामार्ग पूर्ण झाला असून नागपूर विजयवाडा महामार्ग लवकरच पूर्ण होणार आहे. याच्या अवती भवती उद्योगव्यवसाय आणि त्यातून तरुणांच्या हाताला काम मिळू शकते त्यामुळे मोदीजींच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने मुनगंटीवार यांना निवडून द्यावे असंही ते म्हणाले.

चंद्रपूर, मूल, बल्लारपूर शहराचा विकास असेल किंवा ताडोबाचं ब्रॅण्डिंग असेल हे ज्या पद्धतीने सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी शक्य करून दाखवलं तसंच काम लोकसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी ते करतील याविषयी लोकांच्या मनात शंका नाही असं ते म्हणाले. आजचा हा प्रतिसाद बघता ते मोठा विजय संपादन करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर व मोठ्या प्रमाणात नेते कार्यकर्ते सहभागी होते.