पिक विमा भरण्यास राज्याच्या कृषी मंत्र्यांकडून मुदतवाढ

🔸पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्राची घेतली दखल

🔹चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळाला मोठा दिलासा

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.24 जुलै) : – पिक विमा योजनेशी संबंधित जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा मिळाला असून, पिक विमा भरण्याची अंतिम तारीख आता ३१ जुलै २०२४ पर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्याच्या कृषी मंत्र्यांनी जाहीर केला आहे.या संदर्भात पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी मंत्री श्री. धनंजय मुंडे यांना १२ जुलै २०२४ रोजी यासंदर्भात विनंती पत्र देऊन मुदतवाढ करण्याची मागणी केली होती.

चंद्रपूर कृषीप्रधान जिल्हा असून जिल्ह्यामध्ये ३.३३ लक्ष शेतकरी पिक विमा योजनेचे खातेधारक आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२४- २५ अंतर्गत पिक विमा काढण्याची मुदत ही १५ जुलै २०२४ पर्यंत होती. शेतकरी खरीप हंगामातील शेतीच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे व विमा भरताना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे जिल्ह्यातील ५०% पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा काढलेला नव्हता.

पिक विमा न काढल्यास भविष्यात झालेल्या किंवा नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अवकाळी पावसामुळे बहुतेक पिकांचे नुकसान झाले किंवा भविष्यात झाल्यास या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत विमा भरण्याची मुदत ३१ जुलै २०२४ पर्यंत वाढवून मिळण्याची विनंती पालकमंत्री व राज्याचे वन सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषिमंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. 

सदर विनंतीची दखल कृषीमंत्री ना. मुंडे यांनी घेत श्री. सुधीर मुनगंटीवार यांना पत्र देत मागणीची दखल घेतल्याचे कळविले आहे. सदर निर्णयामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.