आता थायलंड – कंबोडिया यांच्यात लष्करी संघर्ष

संपूर्ण जग सध्या युद्धाच्या खाईत लोटले आहे. आशिया, युरोप, अमेरिका सर्वच खंडात कोणत्या ना कोणत्या देशात युद्ध चालू आहे. रशिया युक्रेन युद्ध दोन वर्ष झाली तरी चालूच आहे. इस्राईल हा देश तर सतत वार मोडवर असतो. कधी पॅलेस्टाईन कधी कधी हमास, कधी जॉर्डन तर कधी इराण या देशांशी इस्राईलचे युद्ध सुरूच असते. मागील वर्षी अझरबैजान आणि अल्बेनिया या देशात युद्ध झाले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाचा भडका उडाला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेले ऑपरेशन सिंदूरने तर संपूर्ण जगाची चिंता वाढवली होती. भारत आणि चीन यांच्यात १९६२ पासून तणाव आहे.

चीन आणि तैवान यांच्यातही कायम तणाव असतो या दोन्ही देशात कधीही युद्धाला तोंड फुटेल अशी शक्यता असते. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातही तीच परिस्थिती असते आता त्यात आणखी एका युद्धाची भर पडली आहे आणि हे युद्धही आशिया खंडातील दोन देशातच सुरू झाले आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही देश भारताचे सख्खे शेजारी नसले तरी शेजारी आहेत. भारताचा शेजारी असलेल्या म्यानमार या देशाच्या पलिकडे हे देश आहेत. आशिया खंडातील महत्वाचे असणाऱ्या कंबोडिया आणि थायलंड या देशात सध्या मोठा लष्करी संघर्ष सुरू आहे. या दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहचला असून दोन्ही देशातील सैन्यामध्ये सीमेवर तुफान गोळीबार चालू असून त्यात आतापर्यंत दोन्ही बाजूंनी ३३ सैनिकांचा बळी गेला असून शेकडो सैनिक जखमी झाले आहेत.

सोमवारी या संघर्षास सुरुवात झाली पहिल्याच दिवशी दोन्ही बाजूंचे ११ नागरिक गोळीबारात मारले गेले. थायलंडने गोळीबारास सुरुवात केल्याचा आरोप कंबोडियाने केला तर कंबोडियाने प्रथम गोळीबारास सुरुवात केल्याचा आरोप थायलंडने केला आहे. दोन्ही देश एकमेकांवर आरोप करीत असले तरी दोन्ही देश या युद्धास पूर्वी पासून सज्ज होते फक्त त्यांना युद्धास निमित्त हवे होते ते निमित्त त्यांना सोमवारी मिळाले. सोमवारी सीमेवर गोळीबार झाला आणि युद्धाला तोंड फुटले. मिळालेल्या माहितीनुसार रॉयल कंबोडियन आर्मीने सीमेवर ड्रोन तैनात केले होते. त्यांनी तोफ आणि लांब पल्ल्याच्या बीएम – २१ रॉकेटने गोळीबार केला त्याला थायलंडने चोख प्रतिउत्तर दिले. गोळीबाराने सुरू झालेला हा संघर्ष आता उग्र स्वरूप धारण करत आहे. या युद्धात ड्रोन, रॉकेट, फायटर विमान, तोफा यांचा वापर होत आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या लष्करी तळांवर हल्ला केला जात आहे.

हा लष्करी संघर्ष लवकरात लवकर संपावा अशी जगाची इच्छा आहे. भारतानेही तसे बोलून दाखवले आहे. भारतीय नागरिकांनी या दोन्ही देशात प्रवास करण्याचे टाळावे असे आव्हान भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. अमेरिकेने नेहमीप्रमाणे या युद्धात नाक खुपसले आहे. स्वतःला आंतरराष्ट्रीय तंटामुक्ती संघटनेचे अध्यक्ष म्हणवून घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी लवकरात लवकर हा संघर्ष थांबवावा नाही तर अमेरिका या दोन्ही देशांशी होणारा व्यापार थांबवेल असा दम दिला आहे. मात्र सद्यस्थितीत दोन्ही देश ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. दोन्ही देश एकमेकांवर हल्ला करतच आहेत त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढेल अशीच शक्यता आहे. 

थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशातील वाद हा आताच नाही अनेक दशकांपासून सुरू आहे. प्रिह विहार नावाचे एक मंदिर या दोन्ही देशांच्या सीमेवर आहे. या मंदिराच्या मालकी मालकी हक्कावरून दोन्ही देशांमध्ये तीव्र मतभेद आहेत. हे मंदिर आपल्याच प्रदेशात आहे असा दावा दोन्ही देशांचा आहे त्यावरून २००८ आणि २०११ साली या दोन्ही देशात असाच संघर्ष झाला होता. आता पुन्हा त्याच कारणाने या दोन्ही देशात संघर्ष सुरू आहे. या वर्षीच्या मे महिन्यात एका कंबोडियन सैनिकाला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते तेंव्हा देखील असाच मोठा तणाव निर्माण झाला होता. तेंव्हाच या दोन्ही देशात युद्ध पेटेल अशी शक्यता जाणकारांनी वर्तवली होती. सुदैवाने तेंव्हा तो संघर्ष टळला आता मात्र हा संघर्ष टळू शकला नाही आणि अखेर युद्धाला तोंड फुटले.

श्याम ठाणेदार दौंड (जिल्हा पुणे)