कर्जमाफीपासून वंचित शेतकरी करणार वरोरा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

381

✒️वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.12 जानेवारी) :-  राज्यात भाजप शिवसेना युती असो की महाविकास आघाडी सरकार असो शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे या दोन्ही सरकारने पाठ फिरवून त्यांना जणू वाऱ्यावर सोडल्याचे भयंकर व तितकेच दुर्दैवी चित्र सद्ध्या दिसत असून भाजप सेना युतीने सन २०१७ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तेव्हांचे पात्र शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कर्जमाफी दिली नसल्याने शेतकऱ्यांना स्वतःची शेतीत पेरणी करण्यासाठी सुद्धा पैसे नसल्याने व सावकारी कर्ज वाढल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते रमेश राजूरकर, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे , जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांच्या नेत्रुत्वात वरोरा भद्रावती या दोन तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना घेऊन उद्या दिनांक 13 जानेवारीला सकाळी 1100 वाजेपासून वरोरा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला मनसे राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार , जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांची प्रामुख्याने उपस्थिती रहाणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांची कर्जमाफी दिनांक १.४.२०१२ व त्यानंतर पिक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या व अश्या कर्जापैकी दि. ३०.६.२०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना काही निकषाच्या अधिन राहून सरसकट कर्जमाफी दिली व जे नियमित कर्ज फेडणारे शेतकरी आहेत त्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रूपये जाहिर करण्यात आले. दरम्यान ज्या बँक खात्यात शेतकऱ्यांचे खाते होते त्या बँक शाखेत शासनाकडून निधी जमा करण्यात आला नसल्याने त्या बँकेने शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे निकालीत न काढता त्यांनी सरकार कडून निधी आला नसल्याने तुमची कर्जमाफी किंवा कर्ज माफ होवू शकत नाही असे शेतकऱ्यांना स्पष्ट सांगितले.

दरम्यान महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेत्रुत्वात उदयास आल्यानंतर त्यांनी सुद्धा कर्जमाफी केली पण त्या कर्जमाफीच्या यादीमध्ये सुद्धा त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. वरोरा-भद्रावती तालुक्यात जवळपास ११०० शेतकरी यांना शासन प्रशासन व विद्यमान वनमंत्री व तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदने व तक्रारी दिल्यानंतर सुध्दा कजमाफी झाली नसल्याची बाब समोर आल्याने मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले होते पण अजूनपर्यंत शासनाने या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कुठलाही निर्णय घेतला नसल्याने उद्या ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. 

वरोरा येथील या ठिय्या आंदोलनाला वरोरा भद्रावती या तालुक्यातील कर्जमाफी न झालेले व प्रोत्साहन राशी न मिळालेल्या शेतकऱ्यांसह अतिवृष्टी चे अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपला आवाज शासनापर्यंत पोहचवा असे आवाहन मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे ,भदु तुळशिराम गिरसावळे, सचिन भदुजी गिरसावळे, जयप्रकाश माधव गारघाटे, बेबी वडगुजी सातपुते, अमोल सुधाकर ठाकरे,सिताराम दामु देठे, सुभद्रा नानाजी ठाकरे, अरूण सिताराम देठे, गुलाब जगन गुळघाणे,भोलेनाथ किसनाजी भटकर ,महादेव मुंगल , कवडुजी फकरूजी कारवटकर, मेघराज दादाजी वरभे. नामदेव सांगुले, रमेश रामकृष्ण मंत्री, शेखर मधुकरराव कारवटकर कोसरसार, गोविंदा गणपत काळे यांनी एका प्रशीद्धी पत्रकाद्वारे केले आहे.