वरोरा-भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे विद्युत कनेक्शन तात्काळ द्या

330

🔸महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्रजी फडणविस व आमदार किशोर जोरगेवार यांना निवेदन 

🔹स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवि शिंदे यांचे मार्गदर्शनात निवेदन सादर

✒️मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)

वाघेडा (दि.26 डिसेंबर) :- वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे विद्युत कनेक्शन तात्काळ देणेबाबत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्रजी फडणविस व आमदार किशोर जोरगेवार यांना स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवि शिंदे यांचे मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले.

वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी शेतातील कृषीपंपाला विद्युत कनेक्शन देण्याकरीता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडे रितसर अर्ज सादर केलेले आहे. तसेच विद्युत वितरण कंपनीकडुन मागील तीन ते चार वर्षाअगोदर शेतकऱ्यांना डिमांड देण्यात आलेले आहे व शेतकऱ्यांनी डिमांड सुध्दा भरलेले आहे. परंतु अजुनपर्यंत त्यांना कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन देण्यात आलेले नाही. तसेच काही शेतकऱ्यांनी चार पाच वर्षाअगोदर अर्ज सादर केलेले असतांना सुध्दा त्यांना अजुनपर्यंत डिमांड देण्यात आलेली नाही व त्यांचे अर्ज असेच धुळखात पडलेले आहेत आणि कृषीपंपाला विद्युत कनेक्शन न देण्याचे कारणही कळलेले नाही.

त्यामुळे परिसरातील शेतकरी हतबल झालेला आहे त्यांना कृषीपंपाची जोडणी मिळत नसल्यामुळे काही शेतकरी थेट विद्युत खांबावरून विद्युत कनेक्शन घेत असतात त्यावरसुध्दा विद्युत वितरण कंपनीमार्फत कार्यवाही केल्या जात असते त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची शेती अडचणीत आलेली आहे.शेती हा लघुउद्योग असुन शेतकरी फक्त शेतीवरच उदरनिर्वाह करीत असतो तसेच त्याला रब्बी हंगामाकरीता पाण्याची आवश्यकता असते. स्वतःच्या शेतामध्ये विहीरी, बोअरवेल, ट्युबवेल करून सुध्दा विद्युत जोडणी अभावी शेतकरी आपल्या शेतीला पाण्याचा पुरवठा करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील उत्पन्न बुडत आहे आणि अशाच कारणामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होत आहे.

त्यामुळे लक्ष देवून वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची विद्युत जोडणी तात्काळ करून देण्याची मागणी आहे.यावेळी वासुदेव ठाकरे, ज्ञानेश्वर डुकरे, अक्षय बंडावार, भुमेश वालदे, रोहन खुटेमाटे, तेजस कुभारे, मनोज पापडे, मोहन ठाकरे, शुभम पुल्लवार, अमोल शिंदे, शक्ती गौरकर, शाम जूनिपल्ली आदी उपस्थित होते.