शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात मनसेचे रस्तारोको आंदोलन

🔸कर्जमाफी, अतिवृष्टी, पूरबुडाई व पीक विम्याचे अनुदान देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकाराच्या विरोधात शेतकऱ्यांचे रास्तारोको 

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)       

वरोरा (दि.12 डिसेंबर) :- राज्यात तीन पक्षाचं शिंदे सरकार हे आश्वासने देऊन सुद्धा त्याची पूर्तता न करता उलट शेतकऱ्याचा त्यांनी एक प्रकारे छळ चालवला आहे. कारण चालू हंगामात अतिवृष्टी, पूरबुडाईची नुकसान भरपाई देण्याची घोषणा करून सुद्धा ते पैसे दिले नाही व पीक विम्याचे पैसे सुद्धा इन्शुरन्स कंपन्याकडून दिल्या गेले नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असुन हातात आलेले सोयाबीन गेले कापसाला भाव नाही आणि सरकारची मदत सुद्धा नाही त्यामुळं शेतकरी गळ्याला फास लावण्याच्या स्थितीत पोहचले आहे. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राबवली होती.

त्यापासून वंचित साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी आजपर्यंत केली नाही, त्यात वरोरा भद्रावती क्षेत्रातील जवळपास 5 हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही आणि आता अतिवृष्टी, पूरबुडाई व पीक विम्याचे अनुदान जाहीर करून सुद्धा ते पैसे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष सुधीर खापणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे यांच्या नेतृत्वात वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथे दिनांक 12 डिसेंबर ला दुपारी 12 वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी टेमुर्डा परिसरातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते. 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सन 2017 ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राबवून शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केले होते, परंतु त्यात चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यावेळी झाली नव्हती, त्यामुळे या कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांनी सरकारकडे अनेकदा पाठपुरावा केला व काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सरकारला कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी देण्याचे आदेश दिले होते.

मात्र मागील पाच वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, दरम्यान कर्जमाफी करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दोन वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे आणि चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचे पोर्टल सुरू करू व त्यांच्या खात्यात पैसे टाकू अशी घोषणा केली होती .

परंतु आता हिवाळी अधिवेशनात कुठलाही आमदार शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर गंभीर नसल्याने व यावर्षी झालेली अतिवृष्टी व पूरबुडाई व पीक विम्याचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा आवाज पोहचावा व ह्या शिंदे, फडणवीस व अजित पवार सरकारला जाग यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्थानिक वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन येत्या मंगळवार नागपूर चंद्रपूर मार्गावरील टेमुर्डा येथे रास्तारोको आंदोलनं करण्यात आले. 

या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष उमाशंकर तिवारी, जनहीत कक्ष विभाग जिल्हा अध्यक्ष सुनील गुढे, रमेश काळबांधे, संजय रेड्डी, विशाल देठे, राम पाचभाई, रेवती इंगोले, मोहित हिवरकर, प्रशांत बदकी, संजय काटकर, गजू वादाफाळे, मनोज गाठले, राजेंद्र धाबेकर, युगल ठेंगे, धनराज बाटबरवे, सुनील पाझारे, प्रतीक मुडे, महेंद्र गारघाटे, रामा डुकसे, अशोक दाते, भदुजी गिरसावळे. सुधाकर ठाकरे,गुलाब गुळघाणे, शेखर कारवटकर इत्यादींनी केले.