▫️किशोर टोंगे यांचा भाजपावर हल्लाबोल
✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.22 सप्टेंबर) :- वरोरा भद्रावती तालुक्यातील सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केले असून सोयाबीनचे पीक नष्ट होत आहे. या अनुषंगाने सरकारचे लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टीने भाजपातील काही नेत्यांनी मोर्चा काढल्याने किशोर टोंगे यांनी निशाणा साधला.
सोयाबीनच हातातोंडांशी आलेलं पीक नष्ट होताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत तर दुसरीकडे सत्तेतील लोक मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याऐवजी राजकीय आंदोलन करत आहेत.
आज राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे असून शेतकऱ्यांना त्यांच्याच नेतृत्वात रस्तावर उतरावे लागत आहे ही लाजिरवाणी बाब आहे असंही ते म्हणाले.
जिल्ह्याचे पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचे असून ते अजूनही इकडे फिरकले नाहीत, आमच्या शेतकरी बांधवांचं दुःख समजून घेतलं नाही. त्यांना बांधावर आणण्याऐवजी हे आंदोलन करण्यात मशगुल आहेत यावरून यांची शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी समजते अशी टीका त्यांनी केली.
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी स्वतः, जिल्हाधिकारी व महसूल आणि कृषि यंत्रणेसह तातडीने पाहणी करून अहवाल तयार करावा आणि आपलं वजन वापरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा व हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली.
याविषयी तातडीने कार्यवाही न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन उभे करू यावेळी शेतकरी बांधवांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल असंही ते म्हणाले.
![](https://vidarbhapratishtha.in/wp-content/uploads/2023/01/IMG-20230113-WA00011.jpg)