विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या:- पीयूष रेवतकर

187

विदर्भवाद्यांच्या मोर्चाची विधानभवनावर धडक 

✒️ वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.20डिसेंबर):- स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी संपुर्ण विदर्भातील अकरा जिल्ह्यातून आलेल्या विदर्भवाद्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर जोरदार धडक दिली.या हल्लाबोल आंदोलनाला विदर्भ राज्य जनआंदोलन संघर्ष समिती तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.

यावेळी विदर्भ राज्य जनआंदोलन संघर्ष समितीचे जिल्हाअध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते पीयूष रेवतकर यांनी माजी आमदार तथा आंदोलनाचे नेतृत्व वामनराव चटप व शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांची आंदोलना दरम्यान भेट घेतली व स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्यावर चर्चा घडवून आणली. हजारोच्या संख्येत असलेल्या शिस्तबध्द मोर्चाने आता आम्ही विदर्भ घेतल्याशिवाय राहणार नाही,मागे हटणार नाही असा तीव्र इशारा सरकारला दिला.यानंतर झिरो माइल येथे झालेल्या छोटेखानी सभेत मान्यवरांनी स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन देणारे व नंतर सत्तेत सहभागी झालेल्यांचा खरपूस समाचार घेतला.

स्वतंत्र विदर्भ राज्य हे आमचं जन्मसिद्ध अधिकार असून तो आम्ही मिळविल्याशिवाय राहणार नाही व विदर्भद्रोही सरकारला येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवणार असे मत पीयूष रेवतकर यांनी व्यक्त केले.यावेळी अनेक विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी बलिदान करण्याची तयारी दर्शविली तर अनेकांनी कारागृहात जाण्याची तयारी दर्शविली.२०२४ पर्यंत जर विदर्भ वेगळा झाला नाही तर या आमच्या स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी मी आत्मदहन करेल असा इशारा यावेळी पीयूष रेवतकर यांनी दिला.