✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.16 मार्च) : – आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व सरकारी यंत्रणांच्या सोबत उभे राहणारे होमगार्ड गेल्या दहा वर्षांपासून विविध प्रकारच्या मानधनामध्ये वाढ होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. अलीकडेच पोलीस पाटील व आशा स्वयंसेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. त्याच धरतीवर होमगार्डच्या विविध भत्त्यांमध्येही वाढ करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्त्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना केली आहे.
पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी होमगार्ड्सच्या मानधनात वाढ करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना लिहिले आहे. प्रशिक्षण घेण्याकरिता तसेच सरकारी यंत्रणांना मदतीकरिता होमगार्डमधील उपस्थित सदस्यांना शासनाच्या वतीने कर्तव्यभत्ता, उपहार भत्ता, कवायत भत्ता, प्रशिक्षण भत्ता व धुलाई भत्ता दिला जातो. होमगार्ड्सना देय असणारा उपहार भत्ता, कवायत भत्ता, प्रशिक्षण भत्ता व धुलाई भत्त्याचा निर्णय १४ फेब्रुवारी २०१४मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. तसेच कर्तव्यभत्त्यामध्येही गेल्या पाच वर्षांमध्ये कुठलीही वाढ झालेली नाही, ही बाब पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे लक्षात आणून दिली आहे. या भत्त्यांमध्ये वाढ करण्यासंदर्भात होमगार्ड महासमादेशक यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे, याचाही त्यांनी पत्रात उल्लेख केला आहे.
‘सदैव तत्पर यंत्रणा’ :- स्वेच्छेने काम करणारी व स्नेहकार्यावर अवलंबून असणारी संघटना म्हणून महाराष्ट्र होमगार्ड संघटनेची ओळख आहे. होमगार्ड संघटनेमध्ये सर्व जिल्हा तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था येथे सातत्याने वर्षभर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपातकालीन परिस्थितीमध्ये सर्व सरकारी यंत्रणांना मदतीकरिता होमगार्ड्स सदैव तत्पर असणारी यंत्रणा आहे. त्याचदृष्टीने १९४६ मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. अशा यंत्रणेतील तरुणांना भत्त्यामध्ये वाढ मिळाली, तर त्यांना प्रोत्साहन मिळेल, असेही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.
![](https://vidarbhapratishtha.in/wp-content/uploads/2023/01/IMG-20230113-WA00011.jpg)