🔹उपविभागीय अधिकारी यांनी कंपनी व्यवस्थापनाला नोटीस पाठवून शेतकऱ्यांना न्याय देण्याची दिली हमी
✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा (दि.19 जानेवारी) :- तालुक्यातील निलजई, आमडी वंधली गिरसावळी, माढेळी व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून करनून ट्रान्समिसन लिमिटेड (डब्लू के टी. एल) कंपनीचे टॉवर बांधकाम व टॉवर लाईन चे काम ज्यावेळी सुरु करण्यात आले त्यावेळी कंपनीने बाधित शेतकऱ्यांना शेतातील आराजी नुसार मोबदला देण्याचा करारनामा केला होता.
परंतु ट्रांसमिशन लाइनचे बांधकाम व तार जोडणीचे काम पूर्ण होऊन सुद्धा शेतकऱ्यांना मोबदला दिला गेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या टॉवर च्या मेंटेनन्स काम रोखले, दरम्यान दोन वर्षांपासून शेतकऱ्यांची पायपीट प्रशासनाकडे व कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे सुरु होती पण कुणीही ऐकायला तयार नव्हते त्यामुळे दोन दिवसापूर्वी मेंटेनन्स करण्यासाठी आलेल्या कंपनी च्या कर्मचाऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांना अडवले होते. या दरम्यान कंपनी च्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार करून शेतकऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या कर्मचारी यांना सोडवले व दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनं मध्ये बोलावून कंपनीच्या कर्मचारी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.
परंतु ही बाब उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यकक्षेत येत असल्याने सर्व वंचित शेतकरी यांनी जनआक्रोश संघटनेचे अध्यक्ष अँड अमोल बावणे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे. मनसे वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष मोहित हिवरकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची कैफियत मांडली, त्यावर उपविभागीय अधिकारी यांनी याबाबत कंपनी च्या अधिकाऱ्याना बोलावून बैठक आयोजित करू व शेतकऱ्याचा आर्थिक मोबदला मिळवून देऊ अशी ग्वाही दिली.
शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळवा या करिता मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष मोहित हिवरकर व या प्रकारणाला राज्याचे मंत्रालय ते न्यायालयापर्यंत पोहचविण्याचे काम करणारे जनआक्रोश संघटनेचे अध्यक्ष अँड अमोल बावणे यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार पुकारला असून येणाऱ्या एक महिन्यात जर प्रशासनाने व कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला दिला नाही तर कंपनीचे टॉवर लाईन चे जे खाली चार पाय असतात ते तोडले जाईल असा इशारा दिला आहे.
यावेळी पुंजारामजी चौधरी,अनिकेत तुरारे, गजानन चौधरी, गाणफाडे, मयूर वैद्य, प्रकाश पिसाळकर, हरी बुरघाटे, रमेश धोटे, ज्ञानेश्वर धोटे, हर्षल चौधरी, पजई, जनार्धन चांभारे, राजू झाडें, प्रकाश झाडें,विनायक झाडें,अंबादास झिले, श्रीकांत बावणे, गोपाल येडमे, प्रभाकर भोयर बबन पिसाळकर, विक्रांत तडस, शंकर बुरघाटे, शंकर हुसुकले, मारोती आत्राम, विठ्ठल चौधरी, आत्राम देवढगले इत्यादी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
![](https://vidarbhapratishtha.in/wp-content/uploads/2023/01/IMG-20230113-WA00011.jpg)