मुलांच्या व्यसनावरती पालकांनीही लक्ष देण्याची गरज : रवींद्र शिंदे

224

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadravti प्रतिनिधी)

भद्रावती (दि.26 फेब्रुवारी) : – आजकाल विद्यार्थी कुमारावस्थेत असल्यापासून व्यसनाच्या आहारी जातानाचे चित्र दिसून येत आहे. दारू, सिगारेट, तंबाखू, खर्रा यासोबतच आता ड्रग्ज व गांजाच्या आहारी शाळकरी मुलांपासून तर युवक गेलेले आढळून येते. ही नविन पिढीसाठी अतिशय गंभीर बाब आहे.

यातून ही नविन पिढी वाचविण्यासाठी पालकांनी सतर्क राहणे अतीआवश्यक आहे. पाल्य किती वेळ घराबाहेर राहतो, तो कुणासोबत असतो, पॉकेट मनीचा वापर कशासाठी करतो, त्याच्या खानपाणाच्या सवयी, मनाची अवस्था, या सर्व बाबींकडे नियमित लक्ष देणे व सतर्क राहणे हे आजच्या पालकांचे आद्यकाम असले पाहिजे. कारण एकदा का पाल्य व्यसनाच्या आहारी गेला की त्याला बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात, असे प्रतिपादन रवींद्र शिंदे यांनी केले.

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे ५४ वे व कर्मयोगी गाडगे महाराज यांचे ६६ वे पुण्यस्मरण तथा कर्मयोगी तुकाराम दादा गीताचार्य यांचा १०८ वा जयंती सोहळा भद्रावती तालुक्यातील चेक तिरवंजा (कवठी) येथे दिनांक २५ व २६ फेब्रुवारी २०२३ या दोन दिवस आयोजित करण्यात आला. त्यावेळी रवींद्र शिंदे बोलत होते.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र शिंदे, प्रमुख पाहुणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चंद्रपूर उपजिल्हाप्रमुख भास्कर लटारी ताजने, अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष अनुप कुटेमाटे आदी मंचावर उपस्थित होते.

चेक तिरवंजा (कवठी)चे सरपंच मंजुषा भोगेकर, उपसरपंच गोवर्धन बल्की, ग्रामसेवक अमन गटलेवार, नामदेव मुसळे, पवन मोहितकर, संजय सोनटक्के, गणेश येरगुडे, सुनील ताजने, अनिल खामनकर आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन अभिषेक पाटील यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.