बळीराजाची वाट बिकट – शेतातील पांदन रस्त्यांकडे शासनाचे दुर्लक्ष प्रहार सेवक विनोद उमरे यांचा आरोप

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.17 ऑगस्ट) :- 

दळणवळणाची सोय व्हावी याकरिता गावागावाला रस्ते निर्माण होऊन शहरापर्यंत पोहचले आहे. मात्र गावातील लोकांचे एकमेव उदरनिर्वाहाचे साधन शेती असतांना शेतात जाणारे रस्ते फार चिखलमय असल्याने बळीराजा नावाने ओळखणाऱ्या शेतकरी, मजुरांना फार बिकट परिस्थितीत जावे लागत आहे.

भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाते. मात्र शेतात जाण्यासाठी गरज असलेल्या पांदन रस्ते चिखमय असतांना अशा पायाभूत सुविधांकडेही शासनाचे लक्ष नाही. शेतातील शेतमाल आणण्यासाठी, खते बियाणे ने आण करण्यासाठी, बैलबंडी, गुरे, ट्रॅक्टर, शेतकरी, मजूर, व्यापारी यांना शेतापर्यंत जाण्यासाठी मजबूत रस्त्यांची आवश्यकता असते.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पांदन रस्त्याचे मातीकाम व मुरूमचे काम झाले मात्र जडवाहतुकीमुळे हे सर्व रस्ते फार चिखलमय झाले असून वाहने सोडून माणसांनाही पायदळ जाता येत नाही. रस्ते मजबूत असल्यास बेरोजगार युवकांचेही शेतीकडे कल वाढून आधुनिक शेतीला चालना मिळेल. मात्र समृद्धी महामार्ग, मेट्रो असे रस्त्यांचे जाळे बनविणाऱ्या शासनाचे शेतातील रस्त्यांकडे लक्ष नसल्याचे प्रहार सेवक विनोद उमरे यांनी म्हटले आहे.