पथविक्रेत्यांसाठी तात्काळ हक्काची जागा द्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन 

🔸आम् आदमी पक्षाचे राजू कुडे यांचा इशारा

✒️संजय तिवारी चंद्रपूर (जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.8 मे) :- चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात रस्त्याच्या बाजूला अस्थाई स्वरूपात दुकाने चालवणाऱ्या पथविक्रेत्यांवर सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम तात्काळ थांबवावी अशी मागणी आम् आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी केली आहे. 

 कुडे यांनी महानगरपालिकेच्या कारवाईला विरोध दर्शवत म्हटले आहे की, शहरात वाढीव लोकसंख्येसाठी पुरेसे बाजारपेठा उपलब्ध नाहीत. 

त्यामुळे अनेक गरीब व्यापारी रस्त्यावरच दुकाने लावून आपले जीवन जगण्यास भाग पाडले जातात. महानगरपालिकेने या व्यापाऱ्यांसाठी हक्काची जागा उपलब्ध करून दिली नाही तर अतिक्रमण हटाव मोहीम थांबविली पाहिजे.

 नगररचना अधिनियम आणि टाऊन प्लॅनिंग Act नुसार शहराच्या वाढीव लोकसंख्येनुसार जागेची नियोजन करणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. महानगरपालिकेने किरकोळ व्यापाऱ्यांसाठी जागा राखीव केली असल्यास त्यांना व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून नवीन बाजारपेठा तयार न केल्यामुळेच आज रस्त्यावर दुकाने लावण्याची वेळ आली आहे.

कुडे यांनी पथविक्रेत्यांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तोपर्यंत पोटाची भूक भागवण्यासाठी झटत असणाऱ्या पथविक्रेत्यांवर अतिक्रमण हटाव मोहीम थांबवण्यात यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

 महानगरपालिकेने पथविक्रेत्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्यांना त्वरित न्याय द्यावा अशी अपेक्षा कुडे यांनी व्यक्त केली आहे.