ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ

🔸ना.मुनगंटीवार यांना कृषिमंत्र्यांनी दिला शब्द

🔹पिक विम्याची उर्वरित ५८.९५ कोटी रुपये मिळणार

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि. 10 सप्टेंबर) : – राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ची उर्वरित रक्कम मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी ऑगस्टमध्ये देखील यासंदर्भात पाठपुरावा केला होता. राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये पीक विमा योजनेसाठी तरतूद करूनसुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होती. याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन केवळ पाच दिवसांत चंद्रपूर येथे दोन बैठका तर मुंबई येथे कृषीमंत्री आणि सचिवांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली निघाला होता. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे हे घडले.  

या हंगामात जिल्ह्यातील ३ लाख ५० हजार ९७६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. खरीप हंगाम २०२३ मध्ये सोयाबीन, कापूस व धान या पिकांचे अवकाळी पाऊस व रोगांमुळे नुकसान झाले. पिक विमा काढणाऱ्या जिल्ह्यातील १ लाख ५१ हजार ३३२ शेतकऱ्यांना २०२.७६ कोटी रुपये विमा रक्कम विमा कंपनीमार्फत देय ठरविण्यात आली. यापैकी १४३.८१ कोटी रुपये पिक विमा रकमेचे वाटप झाले आहे. पण, उर्वरीत शेतकऱ्यांच्या पिक विमा नुकसान भरपाईदाखल ५८.९५ कोटी रुपये प्रलंबीत आहेत. 

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला. राज्याचे कृषी मंत्री ना. श्री. धनंजय मुंडे यांच्याकडे पत्रव्यवहार केला. त्यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थिती सांगितली. शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम मिळाली तर शेतीचे पुढचे नियोजन करणे शक्य होईल. शिवाय सणासुदीच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना आधार होईल, अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. 

ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीला विमा हफ्त्याचा राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा मिळालेला नाही. त्यामुळे जिल्हयातील उर्वरीत शेतकऱ्यांची पिक विमा नुकसान भरपाई प्रलंबित असल्याचे विमा कंपनीमार्फत कळविण्यात आले आहे. ही बाब देखील पालकमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ना. श्री. मुंडे यांनी याची दखल घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम लवकरच मिळण्याचा मार्ग त्यामुळे मार्ग सुकर झाला आहे.