जैन धर्मियांचे पर्युषण पर्व म्हणजे क्षमा आणि प्रेमाचा उत्सव – ना. सुधीर मुनगंटीवार

✒️ चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.12 सप्टेंबर) :-जैन धर्मातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्षमायाचना आहे. क्षमा हे वीरांचे भूषण आहे. ज्यामध्ये अहंकार नसतो. क्षमावाणी पर्व मन, शब्द आणि शरीरातून क्षमा करण्याचा संदेश देत असून जैन धर्मियांचे पर्युषण पर्व म्हणजे क्षमा आणि प्रेमाचा उत्सव असल्याचे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

जैन समाजातर्फे आयोजित जैन भवन येथे क्षमापना कार्यक्रमाप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी परमपूज्य श्री.अरुणप्रभाजी म्हारासाब, श्री. गुरुकीर्तीजी म्हारासाब, श्री. गुरुनिधीजी म्हारासाब, श्री. अरुणकीर्तीजी म्हारासाब, सकल जैन समाजाचे अध्यक्ष तथा माजी खासदार नरेश पुगलिया, जैन मूर्तिपूजक संघाचे निर्दोष पुगलिया, स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष योगेश भंडारी, दिगंबर जैन संघाचे अध्यक्ष महावीर सोईतकर, सुभाष जैन, चातुर्मास समितीचे संयोजक देवेंद्र सुराणा, राहुल पुगलिया, डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.

आत्मलक्षी चातुर्मासाच्या पवित्र पर्वावर निमंत्रित करून परमपूज्य म्हारासाबचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मिळाले.असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आत्मलक्षी चतुर्मासात जैन धर्मियांकडून कठीण तपश्चर्या,उपवास करण्यात येते. जैन मंदिरात रोज पांढरे वस्त्र परिधान करून साधकाकडून मन शुद्ध करण्याचे कार्य वर्षभर अविरत सुरू असते. पैसा शरीराला सुःख देतो मात्र, अध्यात्म मनाला आनंद आणि समाधान देते. म्हारासाब यांची आध्यत्मिक संपत्ती फार मोठी आहे. त्यांच्या अध्यात्मिक विचारांचा प्रवाह प्रत्येक गावात आणि लोकांपर्यंत पोहोचतील, त्यातून प्रत्येकाला ज्ञान नक्कीच प्राप्त होईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पालकमंत्री ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, समाजात अध्यात्मिक प्रवाह थांबला आहे. त्यामुळे समाजात आध्यात्मिक प्रगल्भता कमी झाली आहे. अध्यात्मिक नद्या पुन्हा प्रवाही रहाव्या आणि समाजाची अध्यात्मिक प्रगती व्हावी, ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील सर्व नागरिक सुखी ,समाधानी ,आनंदी राहू दे यासाठी परमपूज्य म्हारासाब यांचेकडून आशीर्वाद मागितले.