जय हिंद सैनिक संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र मर्दाने यांची नियुक्ती

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि .21 जुलै) : – समाजभान जपणारे, उच्चविद्याविभूषित समाज कार्यकर्ते राजेंद्र मर्दाने यांची नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारधारेने प्रेरित आणि संविधानाला समर्पित तसेच सैनिक, शिक्षक व शेतकरी यांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या जय हिंद सैनिक संस्था (रजि.) च्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे येथील ऑफिसर्स करिअर अकॅडमीच्या सभागृहात संस्थेचे मुख्य राष्ट्रीय संरक्षक तथा परमाणु वैज्ञानिक डॉ. अरूण कुमार सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव मुधाने, राष्ट्रीय उपाध्यक्ष कॅप्टन नाजुकराव मानकर, राष्ट्रीय महासचिव जनार्दन जंगले, राष्ट्रीय संयोजक डॉ. रवींद्र मर्दाने, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चेनसिंग जाधव, मुंबई जिल्हा महिला ब्रिगेड अध्यक्षा मधुबाला जंगले, ऑफिसर करियर अकॅडमीचे संस्थापक कॅप्टन प्रो. अमितकुमार दुबे, उद्योजक कमल तापडिया, सुमन रानी सक्सेना संस्थेचे पदाधिकारी संजय चक्रनारायण, राजेश राठोड, विवेक राठोड, दीपक बोंबले, तेजाराम देवाशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित जय हिंद सैनिक संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमात संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चेनसिंग जाधव यांच्या हस्ते राजेंद्र मर्दाने यांना टाळ्यांच्या गजरात नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.

       राजेंद्र मर्दाने हे मागील जवळपास ३२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून विविध दैनिक, साप्ताहिकांत त्यांनी विपूल लेखन केले आहे. राष्ट्रीय सामाजिक न्याय कृति मंचाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, डॉ. आंबेडकर – वाल्मिकी वेल्फेअर सोसायटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष ,ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, आनंदवन मित्र मंडळाचे सचिव, पत्रकार सुरक्षा समितीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, वरोडा तालुका प्रेस क्लबचे माजी सचिव, माजी नगरसेवक, विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, शासकीय समितीचे सदस्य म्हणून त्यांनी आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे.

याव्यतिरिक्त साहित्य, कला, क्रीडा, संगीत अशा वेगवेगळ्या क्षेत्रातही त्यांनी भरीव योगदान दिले आहे. विविध क्षेत्रातील नैपुण्य आणि राष्ट्रीय एकता, एकात्मता, अखंडता राखण्यासाठी असलेली तळमळ पारखून त्यांची चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीने राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच माजी सैनिक परिवाराकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.