जनआक्रोश संघटनेच्या पाठीशी नेहमी उभा राहणार 

🔹ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही

🔸ना.मुनगंटीवार यांचा ‘विकासरत्न’ पुरस्काराने गौरव

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.29 ऑगस्ट) :- जनआक्रोश संघटना समाजिक कार्यात अग्रणी आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी अनेक महत्त्वाची कामे केली जातात. या कार्यात कुठलीही अडचण येऊ नये याकरिता जनआक्रोश संघटनेच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे पूर्ण ताकदीने उभा राहणार, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

जनआक्रोश संघटना महाराष्ट्र राज्य द्वारा वरोरा येथे आयोजित स्नेहसंमेलन व सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. जनआक्रोश संघटनेकडून ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना ‘विकासरत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. श्री संत तुकाराम महाराजांची गाथा ना. मुनगंटीवार यांना देण्यात आली. कार्यक्रमाला मुख्य संघटक अविनाश काकडे, संस्थापक ॲड. अमोल बावणे, नरेंद्र पडाल, भाजपा वरोरा विधानसभा प्रभारी रमेश राजूरकर,जिल्हाध्यक्ष विनोद काळे, जिल्हा सचिव राजेंद्र मुगले, संजय बोधे, राहुल दडमल, कल्पनाताई क्षीरसागर, योगिताताई लांडगे, विलास खोड, मायाताई पेंदोर, भूपेंद्र बुरीले,राजमाता जिजाऊ फॉउंडेशनचे महिला पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. 

ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुरस्कार स्वीकारताना जनआक्रोश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. संताजी जगनाडे महाराजांचे जन्मस्थळ सुदुंबरे हे तीर्थक्षेत्र म्हणून घोषीत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे उद्गार ना. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी काढले. राजकारणात मिळालेल्या जनसेवेच्या संधीमुळे शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करू शकलो याचे समाधान असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. 

महाराष्ट्र राज्याचा मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून मच्छीमार बांधवांसाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतल्याचा उल्लेख ना. श्री. मुनगंटीवार यांनी केला. मच्छीमार बांधवांकरिता विकासाची कामे करतानाच त्यांच्या अडचणी सोडविणे, संकटाच्या काळात त्यांना आधार देण्याचे देखील कार्य केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या माणुसकीचे विचार सर्वदूर प्रवाहित व्हावेत या हेतूने चंद्रपूर जिल्ह्यातील छोट्या-छोट्या गावांमध्ये सभागृहांची निर्मिती करण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत विरोधक विशेषत: काँग्रेसकडून सुरू असलेल्या अफवांचाही त्यांनी समाचार घेतला. पुढील काळात योजना अधिक विस्तारीत होईल, पण बंद होणार नाही, असा विश्वास ना.मुनगंटीवार यांनी दिला.